महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन :पुणे; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आज देशभर जनता कर्फ्यू म्हणजेच उत्स्फूर्त संचारबंदी लागली आहे. राज्यभरातून बंदला सकाळपासूनच जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. शनिवारपासून बंद पडलेली महामुंबई उरलीसुरली सुद्ध ठप्प झाली आहे. देशभरात आज सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. कोरोना नियंत्रणासाठी देशवासीयांनी रविवारी स्वयंस्फूर्तीने संचारबंदी पाळावी. आपापल्या घरामध्ये राहावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.
पुणे, पिंपरी चिंचवड , मुंबई , कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, औरंगाबाद, नागपूर अशा सर्वच शहरांमधून जनता कर्फ्यूला सकाळपासून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास सर्वच शहरांमधील प्रमुख चौकांमध्ये पोलिसांचा कडक पहारा असून अनावश्यक फिरणाऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.