महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २९ जानेवारी । हिंगोली । राज्यात सध्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला दुखवटा आणि संप मोडीत काढत राज्यात एकूण २५० बारापैकी २४४ आगारातून अंशत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. तर ६ आगार मात्र अजूनही शंभर टक्के बंद आहेत. आतापर्यंत २४४ आगारातून जवळपास २७१९२ कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत.
यामुळे संप मोडीत निघाला का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे. तर हिंगोलीमध्ये चालक आणि वाहक कर्तव्यावर रुजू होत नसल्यामुळे संप मोडीत काढण्याठी आगारा बाहेरील अधिकारी मंडळी बोलवून त्यांच्या हातामध्ये एसटी बसचे स्टेरिंग देण्यात आले आहेत.
यामध्ये वाहतूक निरीक्षक, पर्यवेक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहन परीक्षक, त्यांना दोन दिवसाचे ट्रेनिंग देऊन हिंगोली आगारातून बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज एकूण ७ बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. यामुळे प्रवाशांसाठी ही दिलासादायक बातमी आहे.