Weather Alert : पुढच्या ३ दिवसांत राज्य गारठणार, तापमान पुन्हा एकदा १० अंशांपेक्षा कमी होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ७ फेब्रुवारी । शहरातील तापमानात वाढ होऊ लागलेली असताना गेल्या दोन दिवसांत परत एकदा थंडी वाढली आहे. शहरात शनिवारी ९.२ अंश, तर रविवारी १० अंश तापमानाची नोंद करण्यात आली. पुढील तीन दिवसांत तापमान १२ ते १३ अंशांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, त्यानंतरच्या दोन दिवसांत परत एकदा १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सध्या पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीर भागात पश्चिमी विक्षोपामुळे काही बदल झाले आहेत. या भागात पाऊस आणि हिमवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तर भारतातसुद्धा परत एकदा थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम मध्य भारतावरही होत आहे. गेले दोन दिवस मध्य भारतातील तापमान हे सरासरीपेक्षा तीन ते पाच अंशांनी कमी होते. शनिवारी शहरातही पारा अचानक ४ अंशांनी घसरला. रविवारी त्यात थोडीशी वाढ झाली. रविवारी दिवसाच्या तापमानात थोडी वाढ झाली.

८ फेब्रुवारीपर्यंत तापमानातील ही वाढ कायम राहणार आहे. तापमान सरासरीच्या आसपास पोहोचून पारा १२ ते १३ अंशाच्या आसपास स्थिरावेल. मात्र, ८ फेब्रुवारीला परत एकदा वायव्येकडील भागात पश्चिम विक्षोपामुळे काही बदल होती. त्यामुळे ९ आणि १० फेब्रुवारी या काळात शहर आणि विदर्भातील पारा अचानक २ ते ४ अंशांनी घसरणार असून तापमान १० किंवा त्याहीपेक्षा कमी नोंदविले जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *