महाराष्ट्र २४ ऑनलाईन; मुंबई – “कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पुढील 3 आठवड्यांमध्ये हे सर्व संपेल असंही नाही. पुढची तयारी ठेवावी लागेल,” असं मत अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे.
“नागरिक किती वस्तूंचा घरात साठा करणार आहेत? माझं त्यांना सांगणं आहे की अन्नधान्य, औषधं, दूध-भाजीपाल्याचा साठा करण्याची गरज नाही. या वस्तू तुमच्या जवळच्या वितरण केंद्रावर पोहचवण्याची पूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत,” असं आश्वासनही छगन भुजबळ यांनी दिलं.
लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई शहरासह राज्यभर भाजीपाला,अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाकडून उपाययोजना केल्या जात असून आज मुंबईतील दादर व भायखळा भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात अन्नधान्याचा अजिबात तुटवडा नाही. 6 ते 8 महिने पुरेल इतकं अन्नधान्य आपल्या कोठारांमध्ये आहे, असंही छगन भुजबळ यांनी नमूद केलं.