महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ फेब्रुवारी । भविष्याच्यादृष्टीने अनेकजण आर्थिक नियोजन करतात. भविष्यात आपल्याकडे पैशांची कमतरता नसावी आणि आपल्या मृत्यू पश्चात कुटुंबीय, वारसदारांना किमान आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठीदेखील अनेक जण आर्थिक नियोजन करतात. कमी गुंतवणुकीत अधिक चांगला परतावा मिळेल अशा योजनांकडे अनेकांचा कल असतो. त्याशिवाय सरकारी योजनांकडे अनेकजण आकर्षित होतात. फक्त दरमहा एक रुपयांच्या गुंतवणूक केल्यास दोन लाखांचा विमा संरक्षण मिळू शकते.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना असे या विमा योजनेचे नाव आहे. यामध्ये अतिशय कमी प्रीमियम भरावा लागतो. ही केंद्र सरकारची योजना आहे. सामान्य नागरिकांना या योजनेबाबत अधिक माहितीदेखील नसते.
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेची वैशिष्ट्ये:
पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही अपघात विमा योजना आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला दरवर्षी 12 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या विम्यात गुंतवणूक केल्यास विमाधारकाला 2 लाखापर्यंतचे विमा संरक्षण मिळते. विमाधारकाच्या वारसाला दोन लाख रुपयांची सहाय्यता निधी मिळतो. तर, अपघातात अंशत: अपंगत्व आल्यास विमाधारकाला एक लाख रुपयांचा निधी मिळतो.
>> योजनेचा लाभ कोणाला ?
> या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय 17 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे.
> तुमचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
>> असा करा अर्ज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नजिकच्या कोणत्याही बँक शाखेत संपर्क साधावा. या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते आणि अर्ज भरता येऊ शकतो.