महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 220 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली असून हा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले असून केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहे. यातच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे, त्यानुसार राज्यात पुढील 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत राज्यात मद्य विक्रीस बंदी घालण्यात आली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे पाहता ही तारीख 14 एप्रिलपर्यंत करण्याचे ठरविले आहे.
परिपत्रकानुसार कोरोना व्हायसरच्या प्रसाराचे माध्यम पाहता हा एका रुग्णाकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीस याचा संसर्ग होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी पुढील 14 एप्रिलपर्यंत सर्व मद्याची दुकाने बंद राहतील. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून मद्य विक्री सुरू करण्यासंदर्भात मागणी केली जात होती. मात्र राज्य सरकारने यावर कडक नियमावली केली आहे आणि 14 एप्रिलपर्यंत मद्य विक्री बंद ठेवण्याचे जाहीर केले आहे.