महाराष्ट्र २४ – ऑनलाईन ; मुंबई : ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारला पत्र पाठवून अजित पवारांनी ही मागणी केली आहे. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राची १६ हजार ६५४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. येत्या ३१ मार्चपर्यंत ही थकबाकी मिळावी, अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे. याप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि प्रकाश जावडेकर यांनी अधिक लक्ष घालावे याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच ग्रामीण भागातही कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे शहरातून कोरोना ग्रामीण भागाच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे राज्यशासनाला ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अशावेळी केंद्र सरकारने आर्थिक मदत करण्याची गरज आहे, अशी मागणी राज्याकडून आता होऊ लागली आहे. होम क्वारंटाईन असणाऱ्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.