महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मार्च । भारत सरकारने 27 मार्चपासून देशातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानांना (International Flights ) उड्डाण करण्यास परवानगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे केवळ आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने परदेशी उड्डाणांसाठी निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच चालतील असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (International Flights Restart From March 27 Says DGCA)
जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 23 मार्च 2020 पासून कोरोनाचा (Corona Pandemic) प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक उड्डाणे निलंबित करण्यात आली होती. यानंतर, 28 फेब्रुवारी 2022 रोजीच्या ताज्या परिपत्रकानुसार, भारतातून आणि भारतातील व्यावसायिक प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आल्या होत्या.
चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय
जगभरात कोविड-19 विरुद्ध लसीकरणाचे (Corona Vaccination Certificate) वाढते प्रमाण लक्षात घेता आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डीजीसीएने म्हटले आहे. तसेच सध्या विदेशी प्रवासी विमानांवरील लागू करण्यात आलेली बंदी 26 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत लागू राहणार असून, एअर बबल करारदेखील त्याच कालावधीसाठी अंमलात राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परदेशी प्रवाशांना भारतात आल्यावर सक्तीने वेगळे ठेवण्याचा नियम सरकारने याआधीच रद्द केला आहे. तथापि, परदेशी प्रवाशाला सक्तीचे लसीकरण पूर्वीप्रमाणेच आवश्यक असणार आहे.