महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ मार्च । जम्मू-काश्मीरमधून (Jammu and Kashmir) एक मोठी बातमी समोर येत आहे. बारामुल्ला आणि पुलवामा जिल्ह्यात (Baramulla and Pulwama districts) सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. भारतीय जवानांनी (Lashkar-e-Taiba) लष्कर-ए-तैयबाच्या (एलईटी) चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. एका गुप्त माहितीनुसार कारवाई करत सुरक्षा दलांनी सोपोरमधील रफियााबादच्या नदिहाल भागाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर चार दहशतवाद्यांना पकडण्यात यश आल्याचं पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं.
शोध मोहीमदरम्यान लष्कर-ए-तैयबा या प्रतिबंधित संघटनेच्या एका दहशतवाद्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. प्रवक्त्यानं पुढे सांगितलं की, अटक केलेल्या व्यक्तीचे नाव फिरदौस अहमद वानी असून तो चेक सेरी पट्टणचा रहिवासी आहे. गुन्ह्यात वापरलेले साहित्य, एक एके-56 रायफल, शस्त्रास्त्रे आणि 30 काडतुसे जप्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान गुप्तचर माहितीनुसार कारवाई करत सुरक्षा दलांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लष्कर-ए-तैयबाशी संबंधित तीन दहशतवादी साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
वागम मधला रहिवासी आमिर नजीर हजार, सुहैल अहमद भट आणि बशीर अहमद गनी यांचा मुलगा नसीर हुसेन अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ग्रेनेड आणि एके-47 रायफलसह आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
प्रवक्त्यान दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासादरम्यान ते दहशतवादी आरिफ हजार उर्फ रेहानचे सहकारी म्हणून काम करत असल्याचं समोर आलं आहे. या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
श्रीनगरच्या मध्यभागी असलेल्या व्यस्त अमीरा कदल पुलावर रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.
मोहम्मद बारीक नावाच्या पहिल्या आरोपीला खानयार येथून अटक करण्यात आली असून प्राथमिक चौकशीनंतर दुसरा आरोपी फाजील नबी सोफी याला अटक करण्यात आली आहे. ग्रेनेड हल्ल्यात वापरलेली दुचाकीही विशेष तपास पथकानं (एसआयटी) जप्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच ही एसआयटी स्थापन करण्यात आली.