महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च । महाविकास आघाडी सरकारने राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget Session) 11 मार्च रोजी विधानसभेत मांडला. अर्थसंकल्पावर सभागृहात आज चर्चेवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अर्थसंकल्पाची पक्षानिहाय फोड करुन कुणाला किती निधी मिळाला याची सविस्तर माहिती दिली. यावेळी आपला माजी मित्रपक्ष शिवसेनेला (Shivsena) डावलून राष्ट्रवादीने (NCP) कशी संधी साधली हे देखील सांगण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला. अर्थसंकल्पात सगळ्यात जास्त निधी राष्ट्रवादीला 57 टक्के, शिवसेनेला 16 टक्के तर काँग्रेसला 26 टक्के निधी मिळाला असं त्यांनी सांगितलं.
अर्थसंकल्पातील एकूण निधीपैकी 3 लाख 14 हजार 820 कोटी रुपये म्हणजे तब्बल 57 टक्के निधी हा राष्ट्रवादीकडील खात्यांनी मिळाला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या खात्यांना 1 लाख 14 कोटी रुपये म्हणजे 26 टक्के निधी मिळाला आहे. सर्वात कमी 16 टक्के म्हणजे 90 हजार कोटी रुपये हे शिवसेनेच्या खात्यांना मिळाले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
या अर्थसंकल्पाच्या सुरवातीला महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा संकल्प अर्थमंत्री अजित दादांनी केला होता. याआधी ही कल्पना मी मांडली तेव्हा सगळ्यांनी खिल्ली उडवली होती. आम्ही मांडलेल्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या जात आहेत. 2-3 वर्षात महसुली तूट कमी दाखवायची आणि पुरवणी मागण्या आणायच्या. महसुली तुटीचा आकडा हा फसवा आहे. बजेट बनवतो दाखवण्या करता आणि खर्च मनमानी करतो. खायचे आणि दाखवायचे दात वेगळे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
घोषणांवर किती विश्वास ठेवायचा. राज्यावरील कर्जाचं प्रमाण वाढलं तर चिंता नको. कर्ज वाढत असताना विकासात्मक किती खर्च हे बघणे महत्वाचं आहे. 4 लाख 51 कोटींचं कर्ज आता 2 लाख कोटींनी वाढलं आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.