कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यामुळे सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; ऑनलाईन ;नवी दिल्ली: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार कोरोनाच्या ज्या रुग्णांना उपचाराची अत्यंत गरज असेल अशांनाच रुग्णालयात दाखल करून घेतले जाईल. उर्वरित लोकांना होम क्वारंटाईन करून डॉक्टर फोनवरून सातत्याने त्यांच्या संपर्कात राहतील. केंद्राच्या धोरणानुसार आतापर्यंत कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करून घेतले जात होते. मात्र, त्यामुळे आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवरील ताण कमालीचा वाढला आहे. तसेच यामुळे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आता सरकारी धोरणात बदल केला जाऊ शकतो, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

केंद्रीय मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या निर्देशांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करणे गरजेचे नसल्याचे म्हटले होते. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित डॉक्टरनेच घ्यावा, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले होते. त्यामुळे कोणताही धोका टाळण्याच्यादृष्टीने डॉक्टरांकडून टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सरसकट रुग्णालयात भरती केले जात होते. मात्र, रुग्णालयांमधील रुग्णांची वाढती संख्या पाहता या धोरणात लवकरच बदल होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *