महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मार्च । गेल्या दोन दिवसांपासून पुणे (Pune) आणि मध्य महाराष्ट्रातल्या (Madhya Maharashtra) काही भागांत अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कमाल तापमानात (Maximum Temperature) किरकोळ घट झाली आहे. तसंच, तापमानाचा पारा 40 अंशांच्या खाली आला आहे. तरीही यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा पारा चक्क 40 अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला आहे. मार्च महिना हा हिवाळा आणि उन्हाळा यातल्या संक्रमणाचा काळ असतो. त्यामुळे मार्च महिन्यात कमाल तापमान हळूहळू वाढत जातं. यंदा मात्र मार्चच्या सुरुवातीपासूनच उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतला.
16 ते 19 मार्च 2022 या कालावधीत (Hot Days Spell) तर पुण्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास राहिला आहे. या दिवसांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा 3 अंशांनी जास्त असल्याची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात तापमान इतकं वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे, याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’नं दिलेल्या वृत्तानुसार, यापूर्वी मार्च 2017 आणि मार्च 2019 मध्ये, पुण्याच्या कमाल तापमानाने 40 अंशांचा टप्पा ओलांडला होता. मार्च 1892 मध्ये 42.8 अंश सेल्सिअसचा सर्वकालीन विक्रम नोंदवला गेला होता. साधारणपणे मार्चमध्ये ओडिशा आणि गुजरातदरम्यान कोअर हीटिंग झोन विकसित होतो आणि कमाल तापमानात वाढ दिसून येते.