महाराष्ट्र २४; ऑनलाईन ; मुंबई – कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २३०५ खाटा कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली आहे.