महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२८ मार्च । विद्यार्थ्यांना दरवर्षी उन्हाळ्यात सुट्ट्या (Summer Vacation) मिळत असतात, मात्र यंदा एप्रिलमध्येही विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागणार आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या उन्हाळी सुट्ट्या आता विद्यार्थ्यांना मिळणार नाही. अभ्यासक्रम पुर्ण करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या. या काळात शाळा बंद असल्यामुळे याचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी शिक्षकांना अभ्यासक्रम पुर्ण करता आला नाही. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतल्याचं समजतंय.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे विशेषत: जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले असून, शाळा बंद राहिल्याने त्यांना शिक्षण घेता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर आता उन्हाळा सुटीत दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज किमान दोन ते तीन तास लेखन व वाचनाचे धडे दिले जाणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात झालेल्या मोठ्या बदलांमुळे उष्णतेची लाट देशभरात आलेली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात एकीकडे तापमान वाढत असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे लागणार असल्याने पालकांची मात्र चिंता वाढली आहे.