२ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट! हवामान खात्याचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३० मार्च । उत्तर भारतात आलेली उष्णतेची लाट महाराष्ट्रातदेखील धडकली आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांत पारा वरचढ झाला असून, आता आलेली उष्णतेची लाट २ एप्रिलपर्यंत कायम राहील. तसेच या काळात अतिनिल किरणांचा धाेका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

३० मार्च ते २ एप्रिल
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू, हिमाचल प्रदेश, सौराष्ट्र कच्छ, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण उत्तर प्रदेशाला देखील उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
– भारतीय हवामानशास्त्र विभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *