महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ एप्रिल । देशात पुढील चार ते पाच दिवसांत उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणखी वाढणार आहे. मध्य आणि पश्चिम हिंदुस्थानात तापमान धोक्याची पातळी गाठणार आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात तापमानात अधूनमधून मोठी वाढ होईल. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशाचा बराचसा भाग उष्णतेच्या लाटेने ग्रासलेला आहे. बहुतांश राज्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिकांची दमछाक झाली असून याचा विजेच्या मागणीवरही मोठा परिणाम झाला आहे. या अनुषंगाने हवामानशास्त्र्ा विभागाने (आयएमडी) अलर्ट जारी केला आहे. पुढील चार दिवस तीव्र उष्णता राहणार असल्याचा अंदाज वर्तवून आयएमडीने कामगार मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय तसेच अग्निशमन विभागाला खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
मुंबईसह राज्यभरातील सर्वच शहरांना कमाल तापमानाचे चटके बसत असून, बहुतांशी शहरांचे कमाल तापमान चाळिशी पार गेले आहे. विशेषत: विदर्भात कमाल तापमानाने कहर केला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे ४४ अंश इतके होते. जगभरातील उष्ण शहरांच्या यादील चंद्रपूर सहाव्या क्रमांकावर हाेते. मुंबईचा पारा ३२ अंशांवर पोहोचला आहे.
१ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
२ एप्रिल रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
३ एप्रिल रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल.
चंद्रपूर ४४
मालेगाव ४३.४
वर्धा ४३.२
अकोला ४३.१
अहमदनगर ४२.७
अमरावती ४२
नागपूर ४२
यवतमाळ ४२
गोंदिया ४१.८
जळगाव ४१.८
सोलापूर ४१.६
वाशिम ४१.५
नांदेड ४१.४
परभणी ४१.३
बुलडाणा ४०.५
गडचिरोली ४०.२
सांगली ४०.२
सातारा ३९.५
कोल्हापूर ३९.६
औरंगाबाद ३९.३
पुणे ३८.७
नाशिक ३७.३
मुंबई ३२.६