महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ मे । नागपूरसह संपूर्ण विदर्भात 8 मे ते 10 मेपर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाने (Meteorological Department) व्यक्त केला. सध्या विदर्भात असलेल्या तापमानात आणखी वाढ होणार आहे. चंद्रपूर (Chandrapur), वर्धा, अकोला या जिल्ह्यांत तापमान 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यात सुद्धा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. नागपूर हवामान विभागाचे सहसंचालक एम एल साहू यांनी ही माहिती दिली. वाढत्या तापमानामुळं दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, असं आवाहन करण्यात आलंय. खूपच महत्त्वाचं काम असेल, तर उष्णतेपासून बचाव (Heat waves) होईल, याची काळजी घ्यावी, असंही प्रशासनातर्फे सांगण्यात आलंय. नागपूर शहरातील काही सिग्नल दुपारी बारा ते चारच्या दरम्यान बंद राहणार आहेत. याचा अर्थ दुपारी सिग्नलवर प्रवाशांना थांबावं लागणार नाही.
कालचं नागपूरचं तापमान 43.7 अंश सेल्सिअस होतं. उद्यापासून ते 44 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अकोल्यातही 43.7 डिग्री अंश सेल्सिअस तापमान होतं. ते दोन-तीन दिवसांत 44 ते 45 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. चंद्रपुरात कालच 45.2 अंश सेल्सिअस तापमान होतं. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आधीच होरपळून निघालेल्या विदर्भवासीयांना या वाढत्या तापमानामुळं आणखी उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार आहे.