महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ मे । आयपीएलच्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पहिल्या अव्वल संघांमध्ये जशी हातघाईची लढाई सुरू झाली आहे, तशी तळ्यात-मळ्यात असलेल्या संघांची अस्तित्वासाठी लढाई सुरू झाली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स याच पंक्तीतले संघ. आज हे एकमेकांसमोर येत आहे. राजस्थानचा प्रयत्न प्लेऑफ निश्चित करण्यासाठी असेल, तर दिल्लीला या आव्हानासाठी विजय आवश्यक आहे.
प्लेऑफमध्ये बाद फेरीच्या सामन्यातील पहिल्या चार संघात स्थान मिळवण्यासाठी दिल्लीचे अजून तीन साखळी सामने शिल्लक आहेत. हे तिन्ही सामने जिंकले, तरच त्यांना बाद फेरी गाठता येईल. म्हणजेच आज पासून त्यांची ‘बाद फेरी’ सुरू होणार आहे. (ipl today match rr vs dc)
रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्लीचा संघ सध्या ११ सामन्यांत १० गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांच्यासह हैदराबाद, कोलकता आणि पंजाब यांचेही १० गुण आहेत; तर लखनौ आणि गुजरात अगोदरच पहिल्या दोन क्रमांकावर आहेत; तर राजस्थान आणि पंजाब प्रत्येकी १४ गुणांसह दिल्लीच्या पुढे आहेत. दिल्लीसाठी एकच जमेची बाजू म्हणजे त्यांची निव्वळ सरासरी त्यांच्याशी स्पर्धा असलेल्या इतरांच्या तुलनेत चांगली आहे.
उत्तमोत्तम खेळाडू असतानाही दिल्लीचा संघ सातत्यात कमकुवत राहिला आहे. लय मिळाल्यानंतर त्यांना विजयी मालिका कायम ठेवता आलेली नाही. हैदराबादविरुद्ध दणकेबाज विजय मिळवल्यानंतर दिल्लीला चेन्नईकडून ९१ धावांनी मोठी हार स्वीकारावी लागली होती. अजूनपर्यंत फॉर्मशी झगडत असलेल्या कॉन्वेने दिल्लीच्या गोलंदाजांची पिटाई केली. त्यामुळे २०० धावांचे ओझे दिल्लीच्या फलंदाजांना सहन करावे लागले होते.
गोलंदाजी ही दिल्लीचा प्रमुख समस्या राहिली आहे. कुलदीप यादव हा एकमेव गोलंदाज विकेट मिळवत आहे; परंतु त्यासाठी तो देत असलेला धावांचा मोबदला चिंता वाढवणारा आहे. वेगवान गोलंदाज एर्निच नॉर्किया याला पुन्हा संधी देण्यात आली; पण त्यामुळेही काही फरक पडला नाही.
दिल्लीच्या तुलनेत राजस्थानचा संघ समतोल आणि फॉर्मात आहे. सर्वाधिक धावा आणि विकेट मिळवणारे जोस बटलर आणि युझवेंद्र चहल असे खेळाडू त्यांच्या ताफ्यात आहेत. सात सामने वगळल्यानंतर पुन्हा संधी मिळालेला सलामीवीर यशस्वी जैसवाल फारच धोकादायक झाला आहे. गोलंदाजीत चहल आणि अश्विन यांच्यासह टेंट्र बोल्ट फॉर्मात आहेत. मात्र पुत्रप्राप्तीसाठी शिमरॉन हेटमायर मायदेशी गेल्यामुळे त्याची उणीव जाणवू शकते.
पंतकडूनही मोठी खेळी नाही
संघाला गरज असताना एकहाती विजय मिळवून देण्याची क्षमता असलेला कर्णधार रिषभ पंतला एकही मोठी खेळी करता आलेली नाही. तो धडाकेबाद सुरुवात करत आहे; पण काही वेळातच तो विकेट बहाल करून बाद होत आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी रोमवेल पॉवेलवर येत आहे; पण कधी कधी त्याच्याही हातात काही राहत नाही. आता दिल्लीला या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.