महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीमुळे (Corona Pandemic) रोजगार, व्यवसायावर वाईट परिणाम झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर काहींचे व्यवसायही बंद पडले. अशातच महागाईने (Inflation Rate) कंबरडे मोडल्याने सामान्य माणूस आता दुहेरी संकटात सापडला आहे. यातच आता सामान्य जनतेला निराश करणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. महागाई कमी होईल या आशेवर सर्वसामान्य जनता होती. मात्र, एप्रिलमध्ये महागाई दरात वाढ (High Inflation Rate) नोंदवली गेली आहे.
आकडेवारी काय सांगते?
आधीच गॅसचे वाढते दर, पेट्रोल डिझेलचे वाढते दर यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. त्यातच आता एनएसओने एप्रिल महिन्यासाठी जारी केलेल्या कन्जयूमर प्राइस इंडेक्समध्ये (CPI) महागाई दर मागील आठ वर्षांत सर्वात जास्त स्तरावर पोहोचला आहे. एप्रिलमध्ये महागाई दर वाढून 7.79 टक्के इतका झाला आहे. तर याच वर्षी मार्चमध्ये हा महागाई दर 6.95 इतका होता. तर मागच्या वर्षाच्या तुलनेत एप्रिलमध्ये हा दर 4.93 टक्के इतका नोंदवण्यात आला होता.
यावर्षी एप्रिलमध्ये अन्न धान्याच्या महागाईतही वाढ झाली आहे, ही केंद्र सरकारसाठी चिंतेची बाब आहे. मार्चमध्ये अन्न महागाई दर हा 7.68 टक्क्यांवरुन वाढून 8.38 टक्के इतका झाला आहे. सर्वात जास्त महागाई ही भाजीपाल्यांमध्ये वाढली आहे. मार्चमध्ये भाजीपाल्यांची महागाई दर हा 11.64 इतका होता. तर तेच एप्रिलमध्ये तो वाढून 15.41 टक्क्यांवर पोहोचला.
फेब्रुवारीत औद्योगिक उत्पादन किती –
याचप्रकारे इंधन-वीज महागाई 7.52 टक्क्यांवरुन 10.80 टक्के, डाळीचा महागाई दर 2.57 टक्क्यांवरुन घटून 1.86 टक्के, कपडे- चप्पल महागाई 9.40 टक्क्यांवरुन 9.85 टक्क्यांवर, तर गृहनिर्माण महागाई 3.38 टक्क्यांवरुन 3.47 टक्के इतके झाला आहे. तर मार्चमध्ये औद्योगिक उत्पादना 1.9 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, ही सरकारसाठी एक दिलासादायक बाब आहे. फेब्रुवारीमध्ये औद्योगिक उत्पादन 1.5 टक्के इतके होते.