महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.९ जून । मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशानुसार मुंबईत गुरुवारपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय मोठ्या आवाजात वाहन चालवणाऱ्यांचीही खैर नाही. नुकतेच डीसीपी राज टिळक रोशन यांनी एक अधिसूचना जारी केली होती की, 9 जूनपासून लोकांनी हेल्मेट घालूनच दुचाकी चालवावी. यामध्ये दुचाकीस्वार आणि मागे बसलेल्या स्वारांचाही समावेश असेल. हेल्मेट न घालता वाहतूक पोलिसांनी त्यांना पकडल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. त्यांचा परवाना 3 महिन्यांसाठी निलंबित केला जाईल, तर 500 रुपयांपर्यंतचा दंडही आकारला जाईल.
गुरुवारपासून हा आदेश महानगरात लागू झाला आहे. वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी, 50 ठिकाणी विशेष वाहतूक चौक्या उभारण्यात आल्या आहेत, जिथे पोलिसांना केवळ वेग मोजणारी यंत्रेच दिली नाहीत, तर ड्रिंक अँड ड्राईव्हवर कारवाई करण्यासाठी त्यांना अत्याधुनिक उपकरणेही दिली आहेत. याशिवाय वाहनचालकांकडून होणाऱ्या गैरवर्तणुकीला आळा घालण्यासाठी चालान कापण्यासाठी मशिन आणि अंगावरील कॅमेरे देण्यात आले आहेत.