![]()
टॉलस्टॉय मार्गावर आंदोलक-पोलिस आमनेसामने; दगडफेकीनंतर लाठीचार्ज, अनेक जखमी; दिल्लीत सुरक्षा अधिक कडक
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ जुलै २०२६ ।। दिल्लीतील जंतरमंतर परिसर पुन्हा एकदा संघर्षाच्या ज्वाळांनी पेटला आहे. नीट पेपर लीक प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी रात्री हिंसक वळण लागले. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा जोरदार संघर्ष झाला. टॉलस्टॉय मार्गावर अचानक दगडफेक सुरू झाल्यानंतर परिस्थिती चिघळली आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. राजधानीत पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा जंतरमंतरवरून काही आंदोलक टॉलस्टॉय मार्गाच्या दिशेने निघाले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही आंदोलकांकडून पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवर दगडफेक तसेच बाटल्या फेकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये एका बाजूला आंदोलकांकडून दगडफेक होत असल्याचे, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात येत असल्याचे दृश्य दिसत आहे. या धुमश्चक्रीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटना घडल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आणि RAF च्या अतिरिक्त तुकड्यांनी तातडीने परिसराचा ताबा घेतला. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, टॉलस्टॉय मार्ग आणि जंतरमंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुढील कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, आंदोलकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. या घटनेनंतर राजधानीतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नीट पेपर लीक प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनामुळे दिल्लीत सलग तिसऱ्यांदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघालेला नसताना आंदोलन अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे, पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ आणि अन्य पुरावे तपासण्यास सुरुवात केली आहे. आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून, येत्या काही दिवसांत दिल्लीतील परिस्थिती आणखी संवेदनशील राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.