महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२७ जून । शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट बनविणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यापुढे कायदेशीर पेच निर्माण झाले आहेत. दोन तृतीयांश आमदारांचा गट जरी त्यांच्यासोबत असला, तरी त्या गटाला अन्य कुठल्या तरी पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बंडखोरांचा गट राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेत प्रवेश करू शकेल. त्यादृष्टीने पडद्याआड जोरात हालचाली सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची बडोदा येथे रात्री उशिरा बैठक झाली. त्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर लढाई लढायची असल्यास त्यात वेळ निघून जाईल आणि तेवढा धीर आमदारांमध्ये नाही. त्यांना त्यांच्या मतदारसंघात नकारात्मक वातावरण तयार होण्याआधीच या प्रश्नावर तोडगा हवा आहे.
कायदेतज्ज्ञांच्या मते…
– दोन तृतीयांश आमदारांनी एकत्र येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तरच त्यांची आमदारकी कायम राहते. त्यामुळे आता बंडखोर आमदारांचा गट मनसेमध्ये प्रवेश करेल. जेणेकरून त्यांची आमदारकी कायम राहील.
– शिवाय राज ठाकरे त्यांच्या पक्षात बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरतात. त्यांचे नाव वापरतात. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा नारा बुलंद केलेला आहेच. त्यामुळे हे सगळे फायद्याचे ठरेल, असे एकनाथ शिंदे यांना पटवून देण्यात आल्याचे समजते.