महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीनदा शिवसेना फोडली. शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकद दिली जाते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केली.
केसरकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीस यांनीच आम्हाला संरक्षण दिले. सभागृहात बहुमत चाचणी घ्या, त्या वेळी सर्व चित्र स्पष्ट होईल.
राऊतांनी राजीनामा द्यावा
राऊत हे शिंदे गटावर घाणेरड्या भाषेत टीका करत आहेत. आम्ही भाजप-शिवसेना युतीच्या जिवावर निवडून आलो आहोत. राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये. संजय राऊत हे आमच्यामुळे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.