महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ जून । एकनाथ शिंदे यांच्या गटाने पाठिंबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. याच दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्री आणि विधानभवन सचिवालयाला पत्र पाठवले आहे. त्यासाठी उद्या विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहे. उद्या सकाळी ११ ते ५ दरम्यान विशेष अधिवेशन होणार असून यादरम्यान ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, गुवाहाटीत असलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आम्ही उद्याच मुंबईत परतणार असल्याचे जाहीर केले आहे. बहुमत चाचणीसाठी आमदार उद्या मुंबईत येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी आज गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीसाठी जाणार असल्याचे सांगितले.
अल्पमतात आलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, अशी मागणी करणारे पत्र भारतीय जनता पक्षाने मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले होते. परिणामी, गेला आठवडाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याचा क्लायमॅक्स आता समीप आला आहे. शिवसेनेेतील बंडानंतर सुरू झालेल्या राजकीय नाट्यात नवव्या दिवशी भाजपने एन्ट्री घेतली आणि सरकारला शक्तिपरीक्षेचे आव्हान देण्यासाठी राजभवन गाठले. आता विधिमंडळ प्रशासनाने शक्तिपरीक्षेची तयारीदेखील सुरू केली आहे.