महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ जुलै । ते मुंबईत आले, मुख्यमंत्री झाले, शपथ घेतली अन् पुन्हा गोव्याला आपल्य साथीदार आमदारांकडे फिरकरले. होय, शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी आटोपून पहाटेच गोवा गाठले. त्यावेळी, इतर सर्वच बंडखोर आमदारांनी त्यांची जंगी स्वागत केलं. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आश्चर्याचे अनेक धक्के महाराष्ट्राला बसले आहेत. त्यातच, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात आपल्या सहकारी आमदारांसोबत सेलिब्रेशन केले, त्यांचे आभार मानले. त्यावेळी, बहुमत चाचणी हे आता केवळ सोपस्कार उरले आहेत. कारण, १७५ आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी, मातोश्रीवर जाणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला होता. त्यावर, मी मातोश्रीला भेट कधी देणार हे वेळ आल्यावर लोकांना कळेल, असे वेळ खाऊपणाचे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदे गटाचे बंडखोर आमदार आहेत. आता त्यांना सोबत घेऊनच शिंदे मुंबईला जाणार आहेत. विशेष म्हणजे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सकाळी शिंदे यांची हॉटेलवर भेट घेऊन मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
शपथविधीनंतर नेमकं काय म्हणाले शिंदे
– राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
– महाराष्ट्रात एक मजबूत सरकार दिसेल. बाळासाहेबांचे हिंदुत्व, मतदारसंघातील कामे आणि राज्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे.
– एकीकडे सत्ता पक्ष, मोठे-मोठे नेते आणि दुसरीकडे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता. अशावेळी या सर्व सहकाऱ्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. याच ताकदीने इतिहास घडविला. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.
– पूर्वीच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही.
– भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचेही आभार. महाविकास आघाडीमुळे अनेक निर्णय घेता येत नव्हते.