महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ जुलै । मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. या महामार्गावरील परशुराम घाटात दरड खाली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद करण्यात आल्याचे समजते. सतत मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मातीसह दरड खाली आहे. यामुळे वाहतूकीसाठी महामार्ग बंद करण्यात आला आहे. घटनास्थळी संबंधित ठेकेदार आणि प्रशासकीय अधिकारी पोहचले आहेत. पर्यायी वाहतूक लोटे चिरणी कळबस्ते मार्गे वळवण्यात आली आहे. तर महामार्गावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, परशुराम घाट महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम करण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 या कालावधीत हा घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक या आधीच्या 22 एप्रिल 2022 आदेशाने पुर्णत: बंद करण्यात आली होती. तांत्रिक कारणास्तव याआधीच्या आदेशामध्ये अंशतः बदल करण्यात आले होते. तर 3 मे ते 25 मे 2022 या कालावधीत दुपारी 12.00 ते सायंकाळी 06.00 या दरम्यान परशुराम घाट महामार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली होती. तथापी, वाहतूक बंदी कालावधीत केवळ कमी वजनाची (Light Vehicle) वाहतूक ही आमडस-चिरणी-लोटे रस्ता कळंबस्ते-आमडस-धामणंद रस्ता मार्गे पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेली होती. चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ नये व कामाला गती मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी धोकादायक क्षेत्रातील काम पूर्ण व्हावे यासाठी घाट बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.