महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ जुलै । 18 पैकी 12 खासदार आणि 22 माजी आमदार आमच्यासोबत येणार आहेत, असा दावा शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी केला आहे. आम्ही ठाकरेंना सोडलं नाही, तर उद्धव ठाकरेंनी आम्हाला सोडलं, असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी अजूनही सावधान राहावं, असा सल्ला त्यांनी दिला आहे. “ज्यांचा गैरसमज होता, त्या कार्यकर्त्यांनी आरोप करणं साहजिक होतं. जोपर्यंत त्यांना आमची बाजू समजत नाही, तोपर्यंत ते आरोप करणार हे आम्हाला माहित होतं. आम्ही सत्तेकरिता बाहेर पडलो नाही. सत्ता सोडून बाहेर पडलोय. लोकं सरपंचपदाची खुर्ची सोडत नाहीत, आम्ही मंत्रिपदाची खुर्ची सोडून बाहेर पडलो. याचा अर्थ असा होतो की आम्हाला आमचा शिवसेना पक्ष वाचवायचा आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.