महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ जुलै । शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेचं संघटन खिळखिळं झाल्याचं बोललं जात आहे. या मुद्द्यावरूनच आता भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेत उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. या सर्व बाबींना संजय राऊतही जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी आता गप्प बसून आराम करावा,’ असा टोला राणे यांनी लगावला आहे.
‘उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यामुळे आता त्यांनी तोंड गप्प ठेवावं, ज्यांना मुख्यमंत्री असतानाही स्वतःचे आमदार सांभाळता येऊ शकले नाहीत ते मतदार काय सांभाळणार? महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी जनतेचे कुठले प्रश्न सोडवले, हे सांगावं. उलट नारायण राणेंच्या घराबाबतीत नोटीस बजावण्याचं काम त्यांनी केलं. अडीच वर्षामध्ये स्वतःच्याच आमदार-खासदारांना ८-८ तास भेटण्यासाठी ते ताटकळत ठेवायचे, त्यांची कामे होत नसायची. केवळ मातोश्रीच्या जवळच्या लोकांचीच कामे करायची,’ असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.