![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । पाणी टंचाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेने आता चार दिवसाआड म्हणजेच पाचव्या दिवसी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी रविवार आषाढी एकादशीपासून केली जाणार आहे. मात्र चार भागांना या निर्णयातून वगळण्यात आले आहे.
उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरातील पाणीप्रश्न गंभीर बनला. या पाणीटंचाईची दखल घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना दिले होते. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पाणी पुरवठा सुरू करण्यासाठी ४२ कलमी उपाययोजना सुरू केल्या. त्यामुळे दीड महिन्याच्या काळात शहरात सुमारे बारा एमएलडी पाणी वाढले आहे. जायकवाडी धरणातून येणाऱ्या पाण्यात सात तर हर्सूल तलावातून पाच एमएलडी पाणी वाढले आहे. तसेच टॅंकर भरण्यासाठी एमआयडीसीकडून पाणी घेतले जात असल्याने तीन एमएलडी पाण्याची बचत झाली आहे.
त्यामुळे आता शहरात पाच दिवसाआड ऐवजी चार दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय प्रशासक श्री. पांडेय यांनी घेतला आहे. मात्र शहरातील तीन जलकुंभ व प्रभाग एन-६ सोडून या निर्णयाची अमंलबजाणी केली जाणार आहे. उद्या १० जुलैला ज्या भागाचे टप्पे असतील त्यांचा पुढील टप्पा चार दिवसानंतर असेल, असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख एम. बी. काझी यांनी सांगितले.
या भागांना पाच दिवसांआड पाणी
प्रभाग सहा, पहाडसिंगपूरा जलकुंभ, मरीमाता जलकुंभ व जिन्सी जलकुंभातून होणारा पाणी पुरवठा पाच दिवसाआड केला जाणार असल्याचे श्री. काझी यांनी नमूद केले.