महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गटानं (Shiv Sena Eknath Shinde) भाजपबरोबर सरकार बनवल्यानंतर आता शिवसेना-भाजप युती पुन्हा होऊ शकते. या युतीची चर्चा देखील सुरु झाली आहे. दोन्ही पक्षांची युती केवळ मानपानात अडकली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबलीय असं केसरकर म्हणाले. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलेली शिवसेना आणि भाजपची युती एका फोनने पुन्हा होऊ शकते, अशी शक्यता आहे.
केसरकर म्हणाले की, हा वाद आमच्यामध्ये नाही. आजही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडा, आम्ही 50 लोकं माघारी येतो असं आम्ही सांगितलं होतं. पण त्यांनी आघाडी तोडली नाही. आता अनायसे आघाडी तुटली आहे. त्यावेळी तरी तुम्ही हा निर्णय घ्या. आम्ही त्यावेळीही सांगितलं होतं की, भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यावेळी तुम्हाला भाजपचाही विचार करावा लागेल, असंही केसरकर म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, आता शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही शिवसेनेचेच आहेत. आम्ही तर शिंदे यांना रोजच फोन करतो. भाजपची शिवसेनेची युती आहेच. त्यामुळं आमच्याकडून उद्धव ठाकरे यांना फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असं ते म्हणाले. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना जबरदस्ती हात वर करुन मुख्यमंत्री बनवले. भाजपने याआधी युती केलीच होती. त्यामुळं आमचा आता प्रश्नच उपस्थित होतच नाही.