Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम , अनेक ठिकाणी ‘रेड अलर्ट’ जारी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १४ जुलै । राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिकच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणासह राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पालघर, पुणे शहर, गडचिरोली, या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट?

रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे
ऑरेंज अलर्ट – मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर
यलो अलर्ट – नंदुरबार, धुळे, जळगाव. अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट, पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत काल रात्री अधून मधून पाऊस पडत होता. मात्र कुठेही पाणी साचण्याची चिन्हे दिसत नव्हती. आज सकाळी 12.33 वाजता मुंबईतील समुद्रात 4.82 मीटर उंचीच्या भरतीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मुंबई आणि मुंबईच्या लगतच्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

अनेक ठिकाणी शाळा बंद

राज्यात आजही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचं चित्र आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तर अनेक ठिकाणी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणं, तलाव ओव्हरफ्लो

आजही मुंबईसह अनेक भागांत जोरदार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काही धरणं, तलाव ओव्हरफ्लो झाली आहेत तर काही ठिकाणी वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. धरणांतील पाणीसाठा वाढल्याने नक्कीच दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या (Maharashtra Flood) आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *