” हा ‘उदय’ त्या तिकडे गेलेल्या उदय चा अस्त केल्याशिवाय राहणार नाही “; अनंत गीते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ जुलै । या एका उदयने ‘त्या’ उदयचा उदय केला पण आज हेच सांगायला आलोय की आता हाच उदय ‘त्या’ उदयचा अस्त केल्याशिवाय राहणार नाही, असं माजी खासदार अनंत गीते म्हणाले. ज्येष्ठ शिवसैनिक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय बने यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी शहरात आयोजित कार्यक्रमावेळी माजी खासदार अनंत गीते यांनी हे वक्तव्य केलं. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावेळी आमदार राजन साळवी,माजी आमदार रविंद्र माने, उदय बने आदी पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. २३ जुलै रोजी शनिवारी रत्नागिरी येथील उदय बने यांच्या कृतज्ञता सोहळ्यात गीते बोलत होते.

हा उदय बने यांचा कृतज्ञता सोहळा आहे आणि दुसरा क्रुतघ्न होऊन निघून गेलाय. पण या गद्दारी केलेल्या आमदारांना धडा शिकवूया, असं अनंत गीते म्हणाले. रत्नागिरी व रायगड जिल्हयाची काळजी करू नका असा विश्वास मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. हे दोन्ही जिल्हे सांभाळायला अनंत गीते समर्थ आहे. रायगडचे तीन गद्दार व रत्नागिरी मधील दोन या पाचही गद्दारांना धुळ चारल्याखेरीज अनंत गीते स्वस्थ बसणार नाही, ही जबाबदारी मी घेतली आहे, असा हल्लाबोल गीते यांनी या कार्यक्रमात बोलताना केला.

मुख्यमंत्र्यांसह ते सगळे आमदार अपात्र होतील

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गेलेले हे सगळे आमदार अपात्र झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि मुख्यमंत्र्यांना राजीनामा दयावा लागणार आहे. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल आणि कदाचित गुजरात बरोबर महाराष्ट्रातही निवडणुका लागतील असे माझे भाकीत असल्याचे गीते म्हणाले. अनंत गीते यांनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. अरुणाचल प्रदेशमधील उदाहरण देत ज्याला भाजपने तिकडे काँग्रेसचे आमदार फोडून मुख्यमंत्री केले, त्याला कोर्टाच्या निर्णयानंतर पायउतार व्हावे लागले व नंतर त्या मुख्यमंत्र्याला मंत्रालयातच आत्महत्या करावी लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रतही सुप्रीम कोर्टाचा निकाल लागेल व मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावे लागेल हे माझ भाकीत असल्याचे गीते यांनी सांगितले.

रत्नागिरी येथे शेतीची कामे आटपली की मोठा मेळावा घेऊ असंही गीते म्हणाले. मी सध्या पायाला भिंगरी लवल्यासखा फिरतोय उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले आहे की कोकणातील दौरा झाला की तुम्हाला येऊन भेटतो. रायगडमध्ये हे गद्दार माझे बॅनरवर फोटो लावतायत कारण त्यांना अनंत गीतेची भीती आहे. मात्र, त्यांना धूळ चारल्याशिवाय हा गीते गप्प बसणार नाही अशी टीका गीते यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *