महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानावर आज (३१ जुलै) रोजी छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर आज सकाळपासून संजय राऊतांची चौकशी केली जात आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राऊतांवरील कारवाईवर बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे कारस्थान लज्जा आणि शरम सोडून सुरु आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.
“लाज लज्जा शरम सोडून निर्लज्जपणाने हे कारस्थान सुरु आहे. हिंदुत्व बोलायचे जेव्हा कोणाचे धाडस होत नव्हते. तेव्हा शिवसेना हा एकमेव पक्ष हिंदुत्वावर बोलत होता. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा हे सगळे कोठे होते,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला केला.