महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । ‘करोना साथरोग, मोबाइल अॅपवर चालणाऱ्या कॅब आणि बाइक टॅक्सी यांमुळे रिक्षाचे प्रवासी घटले आहेत. त्यातच रिक्षांची संख्याही भरमसाठ वाढली आहे. त्यामुळे पूर्वीइतके पैसे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत ‘सीएनजी’चे दर नव्वदीच्या घरात पोहोचल्याने जगणेच अवघड झाले आहे,’ अशी भावना शहरातील रिक्षाचालकांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘सीएनजी’ दरांवर अंकुश लावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनेच पावले उचलावीच, असे साकडे रिक्षाचालक घालत आहेत.
‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ने (एमएनजीएल) ‘सीएनजी’च्या दरांत बुधवारी सहा रुपयांनी वाढ केली. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या ग्रामीण भागात आता सीएनजीचा दर प्रतिकिलो ९१ रुपये झाला आहे. गेल्या चार महिन्यांत ‘सीएनजी’च्या दरात २९ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांच्या खिशावरील भार वाढला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने गेल्या आठवड्यात रिक्षा भाडेदरात वाढ केली; मात्र खटुआ समितीच्या शिफारशींनुसार भाडे दरवाढ नसल्याने आणखी वाढ करावी, अशी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे. त्यानुसार आता पुन्हा भाडेवाढ केली जाणार आहे; मात्र ‘सीएनजी’चे सातत्याने वाढणारे दर पाहून रिक्षाचालकांनी सीएनजी दरावर केंद्र आणि राज्य सरकारचे नियंत्रण हवे, अशी मागणी केली आहे.