महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । देशातील प्रचंड वाढलेल्या महागाईने चिंतित झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चार महिन्यांत रेपो दरात १.४० टक्क्यांनी वाढ केली असून, कर्जांचे ईएमआय वाढत्या महागाईत आणखी वाढले जाणार आहेत. सध्या भारताची अर्थव्यवस्था वाढत्या महागाईने त्रस्त असून, महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक आटोकाट प्रयत्न करत आहे, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. दोन अनपेक्षित घटना आणि अनेक झटक्यांनंतरही देशाची अर्थव्यवस्था जगात ‘स्थिरतेचे बेट’ आहे, असे ते म्हणाले.
‘त्या’ २ घटना कोणत्या?
मोठ्या प्रमाणात अस्थितरता असूनही, भारतीय अर्थव्यवस्था जगात वाढत आहे. सध्या महागाईने कळस गाठला असून, आता ती कमी होण्याची शक्यता आहे. मात्र महागाई सध्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे. अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या दोन अनपेक्षित घटना कोणत्या होत्या, हे मात्र दास यांनी स्पष्ट केले नाही.
महागाई आणखी किती छळणार?
n युद्ध तसेच इतर अनेक घडामोडी आणि वस्तूंच्या किमतीमध्ये झालेली वाढ यामुळे चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई कायम म्हणजे ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
n जून महिन्यात आरबीआयने महागाईचा अंदाज ५.८ टक्केवरून ६.७ टक्के केला आहे. असे असले तरीही वाढलेली खरीप पेरणी, पुरवठा साखळी पूर्ववत होण्याच्या शक्यतेने महागाईचा हा दबाव काहीसा कमी होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.