महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस पडल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत ९५ टक्केपेक्षा जास्त पेरणी झाली होती. परंतु अतिवृष्टी व ढगफुटीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्यामुळे वाहून गेली, करपली, कुजली, पिवळे पडून नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करुन नुकसानी संदर्भात करून तात्काळ शासनाकडे अहवाल सादर करावा. राज्य सरकारने विनाविलंब ओल्या दुष्काळाची घोषणा करावी, अशी मागणी महाराष्ट्र ओबीसी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्र सरकारने एसडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करावी.गोगलगायी व इतर रोगामुळेही अनेक पिके उध्वस्त झाली आहेत. राज्य सरकारने “विशेष बाब” म्हणून आर्थिक मदतीची तरतूद करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली.
बोगस खते, बी, बियाणे औषधीमुळे मराठवाडा व विदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची २५ टक्के पिके उगवली नाहीत. त्यामुळे दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागली आहे. या सर्व बाबीचा विचार करून महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टी, ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व फळबागाचे नुकसान झाल्यामुळे हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत करण्याची मागणी ओबीसी काँग्रेसचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांनी शासनाकडे केली आहे.