महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑगस्ट । नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी हा फोटो आणि त्यासंदर्भात सुरु असणाऱ्या मान-अपमानाच्या चर्चांवर मत व्यक्त केलं आहे.
एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक #मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात! pic.twitter.com/3xYPid3U3N
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 7, 2022
उदय सामंत काय म्हणाले?
रोहित पवार यांनी केलेल्या या ट्विटवरुन उदय सामंत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अगदी शेवटच्या रांगेत उभं केलं आहे, असं रोहित पवार यांनी फोटो ट्विट करत म्हटलं आहे, असं म्हणत उदय सामंत यांची या विषयावरील प्रतिक्रिया पत्रकारांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर उत्तर देताना उदय सामंत यांनी, “फोटो बघितल्यावर एक लक्षात येतं की एकनाथ शिंदे केवळ फोटोसाठी तिथे उभे होते,” असं म्हटलं आहे.
तसेच उदय सामंत यांनी पुढे, “याच्या आगोदरचा एक प्रसंग मी आपल्याला सांगू इच्छितो,” असं म्हणत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात शिंदे पहिल्या रांगेत होते याची आठवण करुनदिली. “राष्ट्रपतींचा शपथग्रहण सोहळा ज्या दिवशी झाला त्या दिवशी एकनाथ शिंदे हे पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला होते. ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव आहे,” असं उदय सामंत म्हणाले.