महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । राज्यात पावसाचा वेग मंदावला असला तरी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Maharashtra Rain) मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात पावसाचा वेग मंदावला असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत किंचीत घट झाली आहे. दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस आता कमी झाला असला तरी तुरळक भागात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान पुणे, मुंबई आणि उपनगरात जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
सध्या गुजरात ते उत्तर केरळच्या किनारपट्टीलगत द्रोणीय स्थिती आहे, तर सौराष्ट्रापासून उत्तर-पूर्व अरबी समुद्रापर्यंत येत्या 48 तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. या स्थितीमुळे कोकणच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहून मुसळधार पाऊस बरसणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल. मात्र, उर्वरित ठिकाणी हलका पाऊस पडेल, तर काही ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे.
10/08, 7.30 pm, हलका ते मध्यम सरी मुंबई ठाणे, नवी मुंबई भागात पुढचे 2,3 तास. pic.twitter.com/fiP1OJIrBl
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 10, 2022
राज्यात 11 ऑगस्टपर्यंत ‘यलो अलर्ट’ पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर (घाट भाग), सातारा (घाट भाग), अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागच्या 24 तासांत पाऊस थांबला असला तरी घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पंचगंगा, कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे. दरम्यान कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली. कसबा बावडा ते शिये मार्गावर तस्ते ओढ्यावरही पाणी आले. पाणी पातळी वाढत असल्याने पूरग्रस्त भागातील नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली.
कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाशेजारील जगबुडी पुलाजवळ पुराचे पाणी वाढल्याने या ठिकाणची वाहतूक बंद केली आहे. बुधवारी सकाळी 12 पासून केर्लीजवळ बॅरिकेडस् लावून कोल्हापूरकडून येणारी वाहतूक जोतिबा रोडमार्गे वळविण्यात आली आहे. बुधवारी रात्री नऊपर्यंत रेडेडोहजवळ अद्याप पुराचे पाणी रस्त्याकडेलाच होते.