महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. राज्यातल्या नव्या शिंदे फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे. गेली अडीच वर्षे विरोधी बाकावर बसणारं भाजपा आता सत्ताधारी बाकावर बसलेलं पाहायला मिळेल. तर शिवसेनेतल्या अभूतपूर्व बंडानंतर शिंदे आणि ठाकरे दोन्ही गट आमनेसामने येणार आहेत. चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने टाकलेला बहिष्कार, वादग्रस्त नेते, आमदार, निर्णयांना दिलेली स्थगिती, ओल्या दुष्काळाची मागणी अशा सगळ्या कारणांमुळे यंदाचं अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित.
आज अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाने होईल. त्यानंतर विधेयकं मांडली जातील आणि शोक प्रस्तावाने आजच्या दिवसाची सांगता होईल.
मुख्यमंत्र्यांकडच्या खात्यांचा कारभार इतरांकडे
पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडची खाती इतर मंत्र्यांनी विभागून दिली आहेत. आपल्या मूळ विभागाची कामं सांभाळून हे मंत्री मुख्यमंत्री शिंदेंकडच्या विभागाचीही कामं पाहतील. ही यादी खालीलप्रमाणे –
माहिती व तंत्रज्ञान – उदय सामंत
परिवहन – शंभूराज देसाई
पणन – दादा भुसे
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य – संजय राठोड
मृदा व जलसंधारण – तानाजी सावंत
मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन – अब्दुल सत्तार
पर्यावरण व वातावरणीय बदल – दीपक केसरकर
अल्पसंख्याक व औकाफ – संदीपान भुमरे