महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रातील हवामान लक्षात घेता मच्छिमारांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे. पावसामुळे यावर्षी जिल्ह्यात आजवर १७९० नागरिकांना फटका बसला आहे. सर्वाधिक दापोली, रत्नागिरी व राजपूर येथील दरडग्रस्त व नुकसान झालेल्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. प्रशासन लक्ष ठेवून आहे. खेड येथे पाचठिकाणी असलेल्या रिलीफ कॅम्प मध्ये १५४ नागरिकांना सुरक्षित हलवण्यात आले आहे.
गेल्या महिन्यात तुलनेत खूपच मागे असलेल्या पावसाने कोकणातील शेतकऱ्यांना आधार दिला. मात्र काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली. कोकणातील रस्ते, साकव, घरे, गोठे यांचे नुकसान झाले आहे. एक दोन ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. मंडणगड व दापोली तालुक्यात दोनठिकाणी घरांना दरडी धोका निर्माण झाला होता. गेल्यावर्षी या कालावधीपर्यंत ३२६९ मिमी तर यावर्षी २७०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता
मुंबईसह राज्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अधूनमधून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार सरी कोसळत आहेत. कोकण आणि घाटमाथ्यावर मंगळवार आणि बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. कोकणात गेले काही दिवस फारसे सूर्यदर्शन झालेले नाही. इतका पावसाळी वातावरणाचा प्रभाव कायम आहे.
दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाड्यात काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.