महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ सप्टेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीतील नेते नव्या शिंदे-फडणवीस सरकारवर सातत्याने निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. याला शिंदे गट आणि भाजपकडून प्रत्युत्तरही दिले जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्या निवासस्थानी जावून गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.
यावेळी नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसमधील एका मोठ्या नेत्यासह पक्षातील आमदारांचा एक गट सरकारमधील भाजपत जाणार असल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावर बोलताना नारायण राणे यांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस छोडो मोहीम भाजपकडून सुरू आहे का? या प्रश्नावर बोलताना राणे म्हणाले, भाजप थेट कृती करते. त्याचबरोबर शिल्लक राहिलेली काँग्रेस वाटून घेऊ, असे नारायण राणे म्हणाले. तसेच एकनाथ शिंदे यांनी घेतलेला एक निर्णय मला आवडला. मागील अडीच वर्ष असलेले सरकार घरी पाठवण्याचा निर्णय त्यांनी घेतला, तो मला खूपच आवडला. त्यामुळे मी त्यांना अभिनंदन करण्यासाठी बोलावले होते, अशी खोचक प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
दरम्यान, बोलताना नारायण राणे म्हणाले की, काँग्रेसमधून काँग्रेसवाले म्हणून येत नाहीयेत. ते त्यांच्या शिवसेनेत येत आहेत. ते शिवसैनिक होणार. ते उलट चांगले काम करत आहेत. एक तर ते शिंदे गटाच्या शिवसेनेत जातील नाहीतर भाजपत येतील. जी काँग्रेस शिल्लक राहिलेली आहे, ती आम्ही वाटून घेऊ, असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले.