महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ९ सप्टेंबर । देशाच्या विविध भागांमध्ये प्रचलित असलेली महागाई राज्यानुसार बदलते. त्यामुळे महागाई रोखण्यासाठी राज्यांसोबतच आता नवे मार्ग शोधावे लागतील. महागाई केवळ केंद्र सरकारकडून हाताळली जाऊ शकत नाही, असं सांगत केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी वाढत्या महागाईच्या मुद्दय़ावरून हात झटकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आयसीआरआयईआरच्या ‘टॅमिंग इन्फ्लेशन’ या परिषदेत बोलताना अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी काही राज्यांतील महागाई ही राष्ट्रीय पातळीवरील महागाईपेक्षा जास्त असल्याचे नमूद करत केंद्र व राज्यांनी यावर एकत्र काम करण्याची गरज असल्याचे सांगितले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया महागाई व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग तयार करते. अर्थव्यवस्थेतील चलनवाढीला हाताळण्यासाठी आर्थिक धोरणासह एकत्रितपणे काम केले पाहिजे, असे सीतारामन म्हणाल्या.
आज ज्याप्रमाणे करपात्र महसुलाच्या वितरणाबाबत बरीच चर्चा होत आहे त्याचप्रमाणे राज्येदेखील त्यांच्या चलनवाढीचे व्यवस्थापन कसे करतात हे समजून घ्यायला हवे. महागाई फक्त केंद्रानेच हाताळली पाहिजे असे होऊ शकत नाही. जेव्हा राज्ये पुरेशी पावले उचलत नाहीत तेव्हा देशाच्या त्या भागात महागाईचा ताण असतो. बाह्य घटक केंद्र आणि राज्य या दोन्हींवर परिणाम करतात, असेही सीतारामन म्हणाल्या.