महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० सप्टेंबर । महाराष्ट्रात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. राज्यात आज म्हणजेच शनिवारी हलका पाऊस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर पुणे (Pune) आणि सातारा (Satara) सारख्या जिल्ह्यांमध्ये रविवारपर्यंत पावसाचा जोर वाढू शकतो, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या १३ सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे(Maharashtra Weather Update).
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) यांसारख्या किनारी जिल्ह्यांतील निर्जन भागात शुक्रवार ते रविवार या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानुसार शुक्रवारी अनेक भागांमध्ये कोसळधार पाहायला मिळाली. शुक्रवारी नाशिकमध्ये (Nashik Rain Update) झालेल्या हलक्या पावसामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
नाशिक जिल्ह्यात एक दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचले होते. तर शहरी भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि धरणांच्या पाण्याची पातळी वाढली होती. मुसळधार पावसामुळे परिसरातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
तर येत्या तीन ते चार दिवसांसाठी हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे. पावसाचा जोर हा पुढील तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं त्याच्या प्रभावामुळं कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहित देखील देण्यात आली आहे.