महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ सप्टेंबर । केंद्रीय मंत्री अमित शाहांनी (Amit Shah) देशातील अर्थव्यवस्थेबाबत मोठं वक्तव्य केलंय. काही वर्षांत भारताची अर्थव्यवस्था (Economy of India) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असं वक्तव्य त्यांनी केलंय. भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही शाह म्हणालेत.
शाह पुढं म्हणाले, एवढंच नाही तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Election) 2 लाख नवीन दुग्ध सहकारी गावं उभारण्यासाठी सरकार मदत करणार आहे. डेअरी उद्योगानं व्यावसायिकता अंगीकारली पाहिजे. या तंत्रज्ञानाबरोबरच संगणकीकरण आणि डिजिटल पेमेंटचा अवलंब केला पाहिजे. या गोष्टींशिवाय पुढं जाणं खूप कठीण आहे. दुग्ध व्यवसायानं दुधाची वाढती देशांतर्गत मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं शाह म्हणाले.
कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. दुग्धव्यवसाय आणि सहकार क्षेत्रानं ग्रामीण विकासात मोठं योगदान दिलं आहे. नैसर्गिक शेती ही डेअरी उद्योगाची जीवनरेखा आहे, त्यामुळं आरोग्य सुधारेल आणि देशाची आर्थिक स्थितीही सुधारेल, असं शाहांनी म्हटलंय.