महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ सप्टेंबर । मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्राची रजा घेतल्यानंतर मधले काही दिवस पावसाने आपले तोंड लवपले होते. पण आता परतीच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार बॅटिंग केली असून यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर येणाऱ्या तीन दिवसांत कोकण, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मान्सूनने राज्याच्या निरोप घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गुरूवारी पाऊस होईल. त्याचबरोबर मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यात शुक्रवारी तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत शनिवारी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नाशिक, ठाणे आणि चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड गडचिरोली या जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती हवामान खात्याचे माजी अधिकारी माणिक खुळे यांनी दिली.
यंदा मान्सूनच्या पावसाने अनेक ठिकाणचा शेतकरी सुखावला असून अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अतिवृष्टीमुळे पाणी आले आहे. त्याचबरोबर आता रब्बीच्या पिकासाठी परतीचा पाऊस महत्त्वाचा असल्याने येत्या तीन दिवसांत राज्यातील विविध ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यात परतीच्या पावसाने लावलेल्या हजेरीमुळे नुकसान झाल्याची माहिती आहे.