महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१ ऑक्टोबर । ‘‘दसरा मेळावे होतच असतात… पंकजाताई मुंडेही दसरा मेळावा घेतात…पण शिवसेना एकच आहे… शिवसेनेचा दसरा मेळावाही एकच… तो म्हणजे शिवतीर्थावर’’, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले. बंजारा समाजाचे नेते महंत सुनील महाराज यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी बंडखोर गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला.
सुनील महाराज हे बंजारा समाजाचे दैवत असलेल्या पोहरादेवीचे महंत आहेत. पोहरादेवी येथे आज ललिता पंचमीदिनी यात्रा भरते. त्याच मुहूर्तावर सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. त्याप्रसंगी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी बंडखोर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल विचारले असता उद्धव ठाकरे यांनी चांगलीच खिल्ली उडवली. कोण कुठे काय करते याच्याशी शिवसेनेचे घेणेदेणे नसून शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला; पण त्याचे उत्तर मिळण्यापूर्वीच शिवसेना दहा पावले पुढे गेली आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड आणि अन्य प्रमुख नेत्यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.
सुनील महाराज आणि बंजारा समाजातील कार्यकर्त्यांचे स्वागत करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा’ असे आपण म्हणतो. नवरात्रीच्या मुहूर्तावर बंजारा समाजातील महंतांनी शिवसेनेत प्रवेश केला. मी त्यांचे स्वागत करतो. बंजारा समाजातील कडवट शिवसैनिक आजही आमच्यासोबत आहेत. कारण शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. पण बंजारा समाजाच्या रक्तात गद्दारी नाही. त्यामुळेच एका निष्ठेने हा समाज आमच्यासोबत आहे.’
राज्यातील दीड ते दोन कोटी बंजारा समाजबांधवांना शिवसेनाच न्याय देऊ शकते. बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास घडवणे हे फक्त शिवसेनेलाच शक्य आहे, असे यावेळी सुनील महाराज म्हणाले. बंजारा समाज खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी फुटीर गटात गेलेले बंजारा समाजातील मंत्री संजय राठोड यांच्यावरही टीका केली. समाजाचे प्रश्न घेऊन आपण राठोड यांच्याकडे गेलो असता त्यांनी आपल्याला हीन वागणूक दिली. आपल्याला चार तास ताटकळत ठेवले गेले आणि नंतर फक्त दहा मिनिटेही वेळ दिला नाही, असे सुनील महाराज म्हणाले.
गद्दार आमदारांनी त्यांच्या दसरा मेळाव्याचा टीझर लाँच केला आहे. त्या टीझरमध्ये त्यांनी आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार असल्याचे म्हटले आहे. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ‘आम्हीच विचारांचे वारसदार आहोत असे सांगावे लागते हेच दुर्दैव आहे,’ असे ते म्हणाले.