महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३ ऑक्टोबर । शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा होऊ नये यासाठी शिंदे गटाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. तसेच वेगळा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासगळ्यामुळे मर्यादा ओलांडून राजकारण सुरू असून ते राज्याच्या हिताचं नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. या आधी देखील त्यांनी शिंदे गटाचे अशा राजकारणावरून कान टोचले होते.
पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार यांनी उत्तर दिली. ‘दुर्दैवानं एका पक्षाचे दोन भाग झाले आणि त्याच्यामुळे स्पर्धा सुरू झाली. स्पर्धा सुरू झाल्यानंतर त्याचं सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. आता गमंत अशी की या गोष्टी होतात. हे नवीन नाही, संघर्ष होतो, पण त्याला एक मर्यादा घातली पाहिजे. मर्यादा ओलांडली नाही पाहिजे आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल तर ते राज्याच्या दृष्टीनं चांगलं नाही’, असं शरद पवार म्हणाले आहेत.
राज्यातले जे जबाबदार लोकं आहेत त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजेत. पावलं टाकायची जबाबदारी आमच्या सारखी ज्येष्ठ लोकं असतील, त्याही पेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत ते राज्याचे प्रमुख आहेत. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. तसंच महाराष्ट्रात कटूता वाढणार नाही अशी मांडणी केली जावी, अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. दोन्ही बाजूंनी अशी अपेक्षा असल्याचंही ते म्हणाले.