महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ ऑक्टोबर । सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आगामी T20 वर्ल्डकपसाठी गुरुवारी सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड देखील दिसत आहेत. या टीमकडून कोट्यवधी भारतीय चाहत्यांच्या आशा आहेत की, यावेळी 15 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात येईल.
‘आम्ही येत आहोत’
भारतीय टीमने शेवटचा टी-20 वर्ल्डकप 2007 साली जिंकला होता. तेव्हा टीमची कमान महेंद्रसिंग धोनीकडे होती. आता रोहित शर्माकडून खूप अपेक्षा आहेत. फोटो शेअर करताना बीसीसीआयने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पिक्चर परफेक्ट. यावेळी करून दाखवा टीम इंडिया. क्रिकेट वर्ल्डकप, आम्ही येत आहोत.
Picture perfect 📸
Let's do this #TeamIndia@cricketworldcup, here we come ✈️ pic.twitter.com/XX7cSg3Qno
— BCCI (@BCCI) October 5, 2022
पर्थमध्ये कॅम्प
टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया पर्थमधील ट्रेनिंग कॅम्पमध्ये सहभागी होणार आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनेही याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पर्थमधील कॅम्पमध्ये ऑस्ट्रेलियातील वेगाची आणि उसळीची सवय करून घेणं हा टीमचा प्राथमिक उद्देश असेल.
ते पुढे म्हणाले की, स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला लवकर रवाना होण्याचा उद्देश खेळाडूंना तिथल्या परिस्थितीशी जुळवून घेणं हा आहे, विशेषत: ज्या क्रिकेटपटूंनी आतापर्यंत त्या देशात एकही सामना खेळला नाही. आयसीसीने आयोजित केलेल्या सराव सामन्यांसाठी ब्रिस्बेनला जाण्यापूर्वी या टीम पर्थमध्ये काही सराव सामने खेळतील.
भारताने सलग दोन सिरीज जिंकल्या
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीमकडून खूप अपेक्षा असणार आहे. या जागतिक स्पर्धेत टीम प्रबळ दावेदार म्हणून उतरत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय टीमने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या यजमानपदी T20 मालिकेत पराभूत केलं होतं. दोन्ही संघ T20 वर्ल्डकपचाही भाग आहेत.