महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ ऑक्टोबर । केंद्रीय निवडणूक आयोागने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर राजकीय वर्तुळात अपेक्षेप्रमाणे प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड असं म्हणतात, जे यापुढे सातत्याने बघायला मिळेल, असे संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेना या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, हे पाहावे लागेल.
उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 9, 2022
मात्र, संदीप देशपांडे यांच्या ट्विटचा एकूणच सूर पाहता मनसेने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वस्व हिरावल्या गेलेल्या उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीचा कोणताही फायदा मिळू नये, यासाठी आतापासूनच तयारी सुरु केल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी मनसे म्हणजे संपलेला पक्ष असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून मनसेकडून शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली जात नाही. मनसेचे आमदार राजू पाटील यांनीही निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेवर निशाणा साधला होता.बंडखोरांपुढे लोटांगण घालून शेवटपर्यंत सत्ता टिकविण्याचा लाचार हव्यास नडला. ‘त्यांची’ जर लगेचच पक्षातून हकालपट्टी केली असती तर किमान पक्षावर नाव व चिन्ह गमावण्याची नामुष्की ओढावली नसती.असो,तरी पण आम्ही तुम्हाला संपलेला पक्ष बोलणार नाही, असे राजू पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.