Team India : “रोहित शर्मानंतर ‘हा’ खेळाडू असणार टीम इंडियाचा नवा कॅप्टन”

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२५ ऑक्टोबर । : पाकिस्तानविरुद्ध दणक्यात विजय मिळवल्यानंतर (Ind VS Pak) आता टीम इंडियाचं लक्ष वर्ल्ड कप ट्रॉफीवर असणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणारी टीम इंडिया T20 World Cup मध्ये शानदार प्रदर्शन करत आहे. त्यामुळे टीम इंडिया वर्ल्ड कपवर शिक्कामोर्तब करेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. मात्र, रोहित शर्मा (Rohit Sharma) पुढील वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.

रोहित शर्मानंतर भारताचा कर्णधार कोण असेल? यावर पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी भविष्यवाणी केली आहे. पाकिस्तानचे दोन दिग्गज गोलंदाज वसीम अक्रम (Wasim Akram) आणि वकार युनिस (Waqar Younis) यांनी मोठं वक्तव्य केलंय. रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) असेल, असं भाकित या दोन स्टार गोलंदाजांनी वर्तवलं आहे.

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) पहिल्यांदाच आयपीएलचे कर्णधारपद भूषवलं आहे आणि पहिल्यांदाच नेतृत्व करताना त्याने संघाला ट्रॉफी जिंकून दिली आहे. तो मानसिकदृष्ट्या देखील खंबीर झाला आहे. टीममध्ये त्याची फिनिशरची भूमिका आहे आणि तो ती चोख बजावत आहे, असं वसिम अक्रम म्हणाला आहे.

हार्दिक पांड्या पुढील भारतीय कर्णधार झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. पहिल्यांदा तो आयपीएलमध्ये कर्णधार झाला. तेथं विजय मिळवला, आता तो संघातील स्टार प्लेयर आहे. तो कॅप्टनला देखील सल्ला देतो. त्याचा स्वतःचा प्रभाव असतो. तो शांतपणे शिकतोय, असं वकार युनिसने म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी मैदानात उतरून विराटला मोलाची साथ दिली होती. या खेळीमध्ये त्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. त्याच्या संयमी खेळीमुळे टीम इंडिया विजयीपथावर पोहोचली आहे. आता आगामी T20 World Cup मध्ये पांड्या कमाल दाखवेल, अशी सर्वांची इच्छा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *